बहुजन रक्षक सेनेच्या वतीने मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
बहुजन रक्षक सेनेच्या वतीने मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
लातूर, दि. १९ (प्रतिनिधींनी) : कु. अनुष्का पाटोळे हत्या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी, तसेच पीडितेला न्याय मिळावा, या ठाम मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या महामोर्चाला लातूर शहर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महामोर्चादरम्यान समाजबांधवांनी “अनुष्काला न्याय द्या”, “दोषींवर कठोर कारवाई करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सहभागी नागरिकांनी हातात फलक, बॅनर्स घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. या वेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आंदोलनादरम्यान बहुजन रक्षक सेनाचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर वाघमारे यांनी मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी त्यांचे आभार मानले.
महामोर्चाच्या शेवटी समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात प्रकरणाचा जलद व निष्पक्ष तपास, दोषींना कडक शिक्षा, पीडित कुटुंबाला न्याय व संरक्षण, तसेच भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, सकल मातंग समाजाने स्पष्ट इशारा दिला की, जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल. या महामोर्चामुळे शहरात दिवसभर चर्चेचे वातावरण निर्माण झाले होते.