पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर
अहिल्यानगर, (प्रतिनिधी) दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेला अहिल्यानगर मेळावा हा समाज बंधुभगिनींच्या ऐक्याचे आणि प्रबळ संघटनेचे दर्शन घडवणारा ठरला. या मेळाव्याने यशाच्या पायरीवर मोठे पाऊल टाकले असून, आता फक्त मानधन व प्रवासाच्या सोयीची अंमलबजावणी हा अंतिम टप्पा शिल्लक आहे.
या मेळाव्याच्या यशामध्ये मा. ॲड. वैजनाथ वाघमारे यांच्या प्रामाणिक, पारदर्शक आणि जबरदस्त नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. समाजातील विविध स्तरांतील पुरस्कारार्थींनी एकत्र येऊन या मेळाव्याला ऐतिहासिक बनवले.
पुरस्कारार्थींनी व्यक्त केले की, “आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सवलती देणाऱ्या हातात समाजसेवेचे आणि जनकल्याणाचे सामर्थ्य आहे. त्यांनी राजकारणापेक्षा सामाजिक सेवेला अधिक प्राधान्य दिले आहे, हे आम्हा सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे.”
मेळाव्यात उपस्थित वक्त्यांनी पुढे सांगितले की, “महामानवाच्या नावाने आम्हाला दिलेल्या पुरस्काराचा आम्हाला अभिमान आहे. या पुरस्कारामागे कोणताही भेदभाव नाही. ज्यांच्या नावाने आम्हाला सन्मान मिळाला, त्या महामानवांप्रती कृतज्ञतेने नतमस्तक होणे हे आमचे कर्तव्य आहे.”
अहिल्यानगर मेळाव्यानंतर काही विघ्नसंतोषी घटकांनी विरोधी प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे निदर्शनास आले. मात्र, वरिष्ठ साहित्यिक आण्णा धगाटे यांनी समाज बांधवांना संयम राखण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, “आपण सत्याच्या मार्गावर चालत आहोत. काही लोकांना आपले ऐक्य आणि यश पाहून अस्वस्थता होत आहे. पण आपण कोणाशीही वादविवाद न करता, संयम आणि श्रद्धा ठेवावी. सत्य परेशान होतं, पण पराजित कधीच होत नाही.”
शेवटी, त्यांनी सर्वांना आवाहन केले की, “श्रद्धा आणि सबुरी ठेवून आपण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत आपला योग्य हक्क आणि प्रश्न पोहोचवूया. आपल्या ऐक्याने आणि संयमानेच अंतिम विजय निश्चित आहे.”
अहिल्यानगर मेळावा हा समाजातील एकतेचा, संयमाचा आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे.