वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले असते तर लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता निश्चित होती, जनतेत चर्चा
वंचितला सोबत घेतले असते तर लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता निश्चित होती, जनतेत चर्चा
लातूर : वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले असते, तर आज लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आली असती, अशी जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात व जनतेतून व्यक्त केली जात आहे.
लातूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता स्थापन होऊन महापौर व उपमहापौरपदाची निवड झाली असली, तरी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची संधी काँग्रेसकडून हातची गेल्याची भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला डावलत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयामुळे अपेक्षित राजकीय लाभ मिळाला नसल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे. जर वंचित बहुजन आघाडीला विश्वासात घेऊन आघाडी करून निवडणूक लढवली असती, तर लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला बहुमताचा आकडा सहज गाठता आला असता, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असल्याने जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येण्याची शक्यता अधिक बळावली आहे. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत
काँग्रेसला २३, भाजपला १८, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १२, शिवसेना १, मनसे १ तर अपक्षांना २ जागा मिळाल्या आहेत. हा कौल पाहता, भविष्यातील सत्ता समीकरणे निर्णायक ठरणार असून काँग्रेसने आपल्या राजकीय धोरणाचा नव्याने आढावा घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
महानगरपालिकेत मिळालेल्या यशाचा उपयोग करून जिल्हा परिषदेतही विश्वासार्ह आघाड्या उभ्या करता येतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.