डुप्लीकेट सोन्याच्या बिस्किटांच्या आधारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश
*डुप्लीकेट सोन्याच्या बिस्किटांच्या आधारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश.
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – 05 आरोपी अटकेत. 09 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.*
लातूर, दि.१४ (प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यात नागरिकांची फसवणूक करून खरे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हडप करणाऱ्या एका अत्यंत संघटित व चलाख टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण, नियोजनबद्ध व धाडसी कारवाईत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण 05 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून टोळीचा मुख्य सूत्रधार संदीप दगडू जाधव हा फरार आहे. आरोपींकडून सुमारे 9,01,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मागील काही काळापासून
ही टोळी डुप्लीकेट सोन्याचे बिस्कीट, अंगठ्या व इतर दागिने तयार करून त्यांचा वापर “खरे सोने” असल्याचा आभास निर्माण करत सामान्य नागरिकांची फसवणूक करीत होती. विशेषतः महिला, वृद्ध नागरिक व एकटे प्रवास करणारे लोक यांना लक्ष्य करून ही टोळी अत्यंत चलाखीने आपला गुन्हेगारी उद्योग चालवत होती. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नमूद प्रकारच्या टोळीचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात डुबलीकेट सोने देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपींचा अनेक दिवसापासून शोध वेगवेगळ्या मार्गाने माहिती संकलित करून विश्लेषण करण्यात येत होते. दरम्यान विशेष पथकाला दिनांक 13 जानेवारी रोजी गरुड चौक, लातूर परिसरात गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, गरुड चौक ते राजीव गांधी चौक रिंग रोडवरील सिंकंदरपूर जाणाऱ्या रस्त्यावर एक टाटा इंडीगो कार व एक होंडा एक्टिवा स्कूटीसह काही इसम डुप्लीकेट सोन्याचे बिस्कीट विक्री करून फसवणूक करण्यासाठी थांबले आहेत.
माहितीची खात्री होताच पथकाने सायंकाळी 5.00 वाजता सापळा लावून पाच इसमांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेले आरोपी
1) अभिमान राजेंद्र कांबळे, वय 25 वर्षे, रा. तुपडी, ता. निलंगा.
2)धनंजय बालाजी गायकवाड, वय 28 वर्षे, रा. दगडवाडीत, लातूर.
3)बालाजी प्रशांत कांबळे, वय 22 वर्षे, रा. तुपडी, ता. निलंगा.
4)बालाजी विठ्ठल गायकवाड, वय 54 वर्षे, रा. भातखेडा, लातूर.
5)सचिन बालाजी गायकवाड, वय 28 वर्षे, रा. मेघराज नगर, शाहू चौक, लातूर.
यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे अंदाजे 42 ग्रॅम खरे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, डुप्लीकेट सोन्याचे बिस्कीट 16 नग, डुप्लीकेट अंगठ्या 03 नग, टाटा इंडीगो कार (MH 23 Y 9222), होंडा एक्टिवा स्कूटी (MH 24 BZ 9308) असा एकूण 9,01,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासात आरोपींनी कबुली दिली आहे की, त्यांचे टोळीचा मुख्य सूत्रधार 6) संदीप दगडू जाधव, वय अंदाजे 27 वर्षे, रा. सलगरा, ता. जि. लातूर, सध्या रा. जठाळ कॉलनी, लातूर (फरार) व सचिन बालाजी गायकवाड हे सोनार व्यावसायिक असून ते डुप्लीकेट सोन्याचे बिस्कीट व दागिने तयार करून देत इतर आरोपी त्या डुप्लीकेट दागिन्यांचा वापर करून लोकांना “खरे सोने स्वस्तात मिळत आहे” किंवा “रस्त्यावर पडलेले सोने आहे” असे सांगून फसवणूक करीत. नागरिकांकडील खरे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन ती सर्व मालमत्ता संदीप जाधव कडे सुपूर्द केली जात असे.
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार व पोलीस अभिलेख तपासणीअंती पोलीस ठाणे उदगीर शहर, औसा, देवणी, शिवाजीनगर, उदगीर ग्रामीण, चाकूर येथे भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 3 (5) अन्वये दाखल गुन्ह्यांशी त्यांचा थेट संबंध आढळून आला आहे .तसेच नमूद टोळीने धाराशिव, नांदेड, परभणी जिल्ह्यातही डुप्लिकेट सोन्याचे बिस्किट देऊन फसवणूकचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहेत.
पुढील कायदेशीर कारवाई करिता नमूद आरोपींना पोलीस ठाणे उदगीर शहर यांच्या ताब्यात देण्यात आले असून टोळीचा मुख्य सूत्रधार व टोळी प्रमुख फरार आरोपी संदीप जाधव याचा पोलीस पथक शोध घेत असून त्याला नमूद गुन्ह्यात लवकरच अटक करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस उप निरीक्षक अमर केंद्रे, राजेश घाडगे, प्रमोद देशमुख, पोलीस अमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, राजेश कंचे, मोहन सुरवसे, युवराज गिरी, मनोज खोसे, आनंद हल्लाळे, प्रवीण कोळसुरे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, प्रदीप चोपणे, व्यंकटेश निटुरे, संतोष खांडेकर, शैलेश सुडे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड यांनी केली आहे.
ही कारवाई लातूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासा देणारी असून, फसवणूक व आर्थिक गुन्हे करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध पोलीस प्रशासन सतर्क व कठोर असल्याचे उत्तम उदाहरण आहे. लातूर पोलीस नागरिकांना आवाहन करतात की, रस्त्यावर किंवा अनोळखी व्यक्तीकडून “स्वस्तात सोने मिळते” अशा आमिषाला बळी पडू नये.अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. अशा संशयास्पद घटना आढळल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. लातूर पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज असून, अशा प्रकारच्या संघटित गुन्हेगारीविरोधात भविष्यातही यापेक्षा अधिक कठोर व प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे.