पुरस्कारप्राप्त व्यक्तींची सामाजिक ऐक्यासाठी मुंबई येथे महत्त्वाची बैठक ९ ऑक्टोबर रोजी
अहिल्यानगर, दि. ८ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सामाजिक ऐक्य आणि प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानुसार गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील मंत्रालयासमोरील शिवसेना कार्यालयात ही भव्यदिव्य बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक मा. वैजनाथजी वाघमारे (मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे खंदे समर्थक व समाजाचे नेते) यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, ते ठाणे येथे होणाऱ्या समाजाच्या शिबीराचे समन्वयक देखील आहेत. या बैठकीत राज्यभरातील सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी उपस्थित राहून समाजाची एकजूट दाखवावी, तसेच सामाजिक प्रश्नांवर न्याय मिळविण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही माहिती अहिल्यानगरचे श्री. नामदेवराव चांदणे यांनी दिली असून त्यांनी सांगितले की, “सर्व पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी या बैठकीत सहभागी होऊन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी, हा समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.”
दरम्यान, दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सन्माननीय भगवानराव गोरखे यांच्या मातोश्रींच्या श्राद्धसमारंभानिमित्त झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सन्माननीय नामदेवराव चांदणे, राजेंद्रजी मोहिते (इचलकरंजी), आण्णा धगाटे, तसेच श्रीगोंदा तालुक्यातील मान्यवर कार्यकर्ते सहभागी होते.
कोल्हापूर व सांगली विभागातील पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये या बैठकीबाबत जागृती करण्याचे काम सन्माननीय राजेंद्रजी मोहिते हे करणार आहेत.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी श्री. नामदेवराव चांदणे (मो. ९२७००४३६९६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.