लाभार्थ्यांचे थकलेले मानधन बँक खात्यावर जमा करा - अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीची मागणी
लातूर, दि. २८ जुलै २०२५ : अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समितीच्या वतीने लातूर तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सं.गा.यो.ई.गा.यो. व इतर योजनांतर्गत निवृत्त लाभार्थ्यांचे थांबलेले मानधन बँक खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सं.गा.यो.ई.गा.यो. व निराश्रित योजनेतील लाभार्थ्यांचे मागील तीन ते चार महिन्यांचे मानधन बँक खात्यावर जमा झालेले नाही. यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये काही लाभार्थ्यांचे मानधन मागील सहा महिन्यांपासून थांबले असून, आधार लिंक, आधार सीडिंग, मोबाईल क्रमांक लिंक, आधार अपडेट आदी कारणांमुळे अडथळा निर्माण झाला आहे.
समितीच्या वतीने असे सांगण्यात आले की, अनेक लाभार्थ्यांनी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक व बँक खात्याशी लिंक करणे पूर्ण केले असतानाही त्यांचे मानधन थकले आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाने विशेष मोहीम राबवून सर्व पात्र लाभार्थ्यांचे थकलेले मानधन त्वरित जमा करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष लालासाहेब गायकवाड, तुकाराम गायकवाड, नागनाथ कांबळे, शिलाबाई तुपसंदरे, विमलबाई गंडले, नवनाथ वाघमारे, सविता जकाते, पत्रकार खंडेराव देडे यांची उपस्थिती होती.
यावेळी गरीबी निर्मूलन समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.